निवडक मुलाखती । भालचंद्र नेमाडे
पाने : २३८ । किंमत : २२५ /- । पेपरबॅक
प्रश्न: मुलाखत म्हणजे काय असतं, भाऊ? आपल्यासारख्यांना वाचकांशी संवाद वगैरे साधण्याचा काय मार्ग उपलब्ध असतो? महाराष्ट्रातली एकजात वर्तमानपत्रादी प्रसारमाध्यमं कोणाच्या हाताशी किंवा हातात किंवा हातची आहेत, सांगा. एकदा वाचकांशी जवळचे संबंध प्रस्थापित व्हायला लागले, की आपोआप पत्रव्यवहार, भेटीगाठी, चर्चा अपुऱ्या पडायला लागतात. मग गावोगाव पसरलेले आपले वाचक मनात वेळोवेळी उद्भवणारे वैयक्तिक प्रश्न समाईक करायला उत्सुक असतात. इथे एकाच भाषेतल्या समूहमनातल्या सार्वजनिक चिंता व्यक्त व्हायला लागतात. मुलाखत हा काही वाङ्मयप्रकार नाही की समीक्षाही नाही. प्रश्न विचारणाऱ्या मुलाखतकारांच्या भागीदारीनं हा एक रचनाप्रकार होऊ शकतो. मुळात हा एक सांस्कृतिक नाट्यसंवाद असतो, अधूनमधून तो लेखक-वाचकांमधला लवाद होऊ पाहतो. इथे त्या त्या वेळेच्या संदर्भानुरूप प्रामाणिक असणं पुरेसं असतं. वाङ्मयप्रकाराला, समीक्षेला याहून बरंच काही लागतं; तरी संकल्पनांचे आपल्याला जाणवलेले अर्थ मुलाखतींमधूनच स्पष्ट करता येतात. एरवी कधीही आपल्या विचारांची मौलिकता व्यक्त करण्याची इच्छा, हाँस, संधी किंवा शक्यता नसलेल्या तल्लख गृहिणी, धडपडणारे विद्यार्थी, अबोल अधाशी वाचक मुलाखतीमध्ये प्रश्न विचारून मोठी मौलिकता मांडतात. आपण चुकीच्या दिशेनं तर साहित्यनिर्मिती करत नाही ना? ही लिहिणाऱ्याला जागरूक ठेवणारी मुलाखतीमधली संवादक्षमता साहित्यव्यवहारात फार मोलाची ठरते. आपल्यासारख्या भांडवलदारी लोकशाहीत भाषणस्वातंत्र्याची सावकारी लेखक- वाचकांवर लादणाऱ्या माध्यमसावकारांना उद्ध्वस्त करण्याचं हे अमोघ उपनिषदी मौखिक साधन आहे.
सहज बोलणे । हित उपदेश । करुनि सायास । शिकविती
Reviews
There are no reviews yet.