दलित पँथर : अधोरेखित सत्य । अर्जुन डांगळे
पाने : ३८४ । किंमत : ६००/- । पुठ्ठाबांधणी
दलित साहित्य चळवळीचा कृतिशील आणि प्रखर आविष्कार म्हणजे १९७२
साली झालेला 'दलित पँथर' चा उदय होय. आक्रमक आणि जहाल भाषेत हा तरुण रिपब्लिकन गटबाज
नेतृत्वाविरुद्ध, हिंदू धर्मावर आणि राज्यकर्त्यांवर टीकेचा भडीमार करू लागला. शिवराळ
भाषाही वापरली जाऊ लागली. दलित तरुणांना आणि जनतेला पँथरने एक दिलासा दिला. 'दलित पँथर'
मध्ये २-३ वर्षात फूट पडली. ही फूट अपरिहार्य होती. एकतर 'दलित पँथर'ची रीतसर बांधणी
होऊन संघटना जन्माला आलेली नव्हती. तो एक उद्रेक होता. कार्यकर्त्यांचा शिस्तबद्ध संच
नव्हता. 'दलित पँथर'ला लोकप्रियता होती तरी तिच्याभोवती असलेला जमाव गर्दीतला होता.
ती गटबाज रिपब्लिकन नेतृत्वाविरुद्धची जनतेची प्रतिक्रिया होती.आणि महत्त्वाचे कारण
म्हणजे वैचारिक आणि व्यक्तिगतदृष्ट्या अतिशय भिन्न प्रवृत्ती असलेल्या दोन लोकांच्या
ठायी पँथरच्या नेतृत्वाचा बिंदू होता. पँथर एक शक्ती म्हणून जरी टिकली नसली तरी एकूण
मरगळलेल्या दलित तरुणांच्या ठायी असलेली सामाजिक जाणिवेची ज्योत 'दलित पँथर'ने प्रज्वलित
केली आणि आंबेडकरी चळवळीतल्या तिसऱ्या पिढीच्या नेतृत्वाच्या आगमनाची चाहूल वर्तवली.