आदिवासी साहित्य आणि अस्मितावेध । भुजंग मेश्राम
संपादक : प्रफुल्ल शिलेदार
पाने :२०० । किंमत : २५०/-
भुजंग मेश्राम यांच्या प्रस्तुत ग्रंथातून त्यांच्या आदिवासी अस्मितेविषयीचा आग्रह प्रकर्षाने दिसून येतो. हा आग्रह धरताना त्यांनी भावनिक आवाहन करण्याचे कटाक्षाने टाळून वैचारिक मांडणी करीत आपले मुद्दे मांडले आहेत. आदिवासी असणे ही मानवी सभ्यतेच्या स्थित्यंतराच्या साखळीतील एक अवस्था आहे असे प्रतिपादन करून ते या अवस्थेतून बाहेर पडण्याची गरज असल्याचे सांगतात. या प्रक्रियेत आपले सांस्कृतिक संचित गमवायचे नाही असे ते ठामपणे मांडतात. आदिवासी असण्याचा त्यांना सार्थ अभिमान आहे. मात्र बदलत्या काळानुसार आदिवासी समाजात जी स्थित्यंतरे होत आहेत त्याबाबत गतकातरता न ठेवता ते मोकळेपणाने परिवर्तनवादी भूमिका घेऊन काळाची पावले ओळखण्याचे कळकळीचे आवाहन करतात. आदिवासींच्या सामाजिक,भाषिक आणि सांस्कृतिक प्रश्नांकडे आतून बघता येऊ शकणे आणि आदिवासींच्या हिताची नेमकी जाणीव असणे यामुळे भुजंग मेश्राम यांचे या ग्रंथातील चिंतन अनन्यसाधारण ठरते.