Click Image for Gallery
फेलिक्स डिसोजा
किंमत १२० रु. / पाने ८४
कवी फेलिक्स
डिसोजा यांच्या नोंदीनांदी या संग्रहातील कवितांमध्ये आधुनिक काळाची सगळी
वैशिष्ट्ये सामावली गेली आहेत. वसई परिसराने आपली आजवरची सांस्कृतिक वैशिष्ट्ये
टिकवून धरण्यासाठी केलेला राजकीय व सांस्कृतिक संघर्ष फेलिक्सच्या कवितांमधून
नेमकेपणाने व्यक्त झाला आहे. विकास आणि आधुनिकीकरण यांच्या नावाखाली आपली ‘गावपणा’शी जोडली गेलेली मुळे उखडली जात आहेत, ही अस्वस्थ
करणारी जाणीव या कवितांचे मध्यवर्ती सूत्र म्हणता येईल. आजी-पणजीची बोलभाषा,
चुलबोळकी, विहीर, हिंदोळा,
गुरे, अशा गावाशी आणि गावातील लोकसंस्कृतीशी
निगडित असलेल्या आणि आपले आजवर भरणपोषण करणाऱ्या अनेक गोष्टी आपल्यापासून हिरावून
घेतल्या जात आहेत, यामुळे कवीसारख्या असंख्य संवेदनशील
मनांची होणारी कासाविशी या कवितांतून अस्सलपणे प्रत्ययाला येत राहते. वरकरणी
स्मरणरंजनात्मक वाटू शकणााऱ्या या कवितांमधून आपल्याच नतद्रष्टपणामुळे नष्ट होत
चाललेल्या हजारो वर्षांच्या आदिम संस्कृतीतील लोकगीतांचे आवाज ऐकू येत राहतात.
ग्रामीण स्त्रियांच्या भावविश्वाशी संबंधित असलेली असंख्य प्रतिमाचित्रे आणि या
स्त्रियांनी जपलेले या भूपरिसरात बोलल्या जाणाऱ्या ‘सामवेदी’
बोलीतील ‘वर्णुका’सारखे
लोकसंस्कृतीतील रचनाबंध या कवितांना अधिकचे कवितिक परिमाण मिळवून देतात.
जागतिकीकरण स्थिरावल्यानंतर खेड्यापाड्यांवर, तिथल्या
पारंपरिक लोकसंस्कृतींवर, शेतीसह पूरक उद्योगांवर आणि एकूणच
मूल्यव्यवस्थेवर झालेले बरे-वाईट परिणाम पुरेशा वृत्तिगांभीर्याने आणि तटस्थपणे अनुभवणाऱ्या
पिढीचा प्रतिनिधी असलेल्या फेलिक्स डिसोजाने आपल्या संग्रहातून जागतिकीकरणोत्तर
कालखंडातील आपले सत्त्व आणि स्वत्व शोधण्यासाठी चाचपडणाऱ्या मराठी कवितेला खूप
महत्त्वाचे योगदान दिले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
- प्रवीण
दशरथ बांदेकर